बजेटमध्ये ५जी स्पेक्ट्रमबाबत अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

business batmya
नवी दिल्ली: गेल्या अनेक महिन्यांपासून भारतात ५जी नेटवर्क उपलब्ध होणार असल्याची चर्चा सुरू आहे. आता अखेर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ५जी बाबत घोषणा केली आहे. यावर्षी स्पेक्ट्रमचा लिलाव केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेट २०२२ सादर करताना लवकरच ई-पासपोर्ट जारी केले जाणार असल्याची माहिती दिली. हे पासपोर्ट मायक्रो चिपसह येतील. त्यांनी माहिती दिली की, खासगी टेलिकॉम कंपन्यांना २०२२-२३ मध्ये ५जी मोबाइल सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक स्पेक्ट्रमचा लिलाव केला जाईल. मात्र ५जी सेवेचा वापर करण्यासाठी लोकांना पुढीलवर्षीपर्यंत वाट पाहावी लागेल. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, स्पेक्ट्रमचा लिलाव यावर्षी होईल. मे २०२२ पर्यंत टेलिकॉम कंपन्यांना ट्रायलची परवानगी मिळाली आहे.
ग्रामीण भागांमध्ये स्वस्त ब्रॉडबँड आणि मोबाइल सेवा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले जातील. याशिवाय केंद्रीय अर्थमंत्र्यांनी डिजिटल चलनाविषयी देखील मोठी घोषणा केली आहे.
भारतीय रिझर्व्ह बँक २०२२-२३ मध्ये डिजिटल रुपये जारी करणार आहे. यासाठी ब्लॉकचेन आणि अन्य टेक्नोलॉजीची मदत घेतली जाईल. भारताच्या पहिल्या डिजिटल करन्सीचे नाव आरबीआय डिजिटल रुपी असेल, अशी माहिती देखील अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली आहे.