गारपीटीनं महाराष्ट्राला झोडपलं

आठवड्याच्या सुरुवातीपासूनच अनेकांनाच हवामान बदलांना सामोरं जावं लागलं आहे. एकिकडे होळीचा उत्साह असतानाच दुसरीकडे हवामान विभागानं नागरिकांना सतर्क करत आगामी दिवसांमध्ये हवामानाची नेमकी काय परिस्थिती असेल याची माहिती दिली.
अचानक बदललेल्या हवामानामुळं मुंबई (Mumbai Rains) आणि उपनगरांमध्ये सोमवारी सायंकाळी आणि रात्री उशिरानं सोसाट्याचे वारे वाहण्यास सुरुवात झाली. तर, काही भागांमध्ये पावसानंही हजेरी लावली.
ठाणे, कल्याण (Kalyan), डोंबिवली, नवी मुंबई (Navi mumbai) इथं पावसाच्या तुरळक सरी बरसल्या.
दरम्यान 8 मार्चपर्यंत हवामानाची हीच परिस्थिती राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करत दिलेल्या माहितीनुसार सोमवारी मध्यरात्री उत्तर मध्य महाराष्ट्रावरून ढग पुढे जाताना दिसले ज्यामुळं ठाणे, कल्याण आणि इतर भागांमध्ये वीजांच्या कडकडाटासह पाऊस झाला.
पश्चिमी झंझावातामुळं अरबी समुद्रात हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. ज्यामुळं अवकाळी पाऊस होत असल्याचं तज्ज्ञाचं म्हणणं आहे. परिणामी 9 मार्चपर्यंत मुंबई, कोकण वगळता मराठवाडा, विदर्भासह राज्याच्या इतर भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात आज गारपिटीचा इशारा देण्यात हवामान खात्यानं दिला आहे. तर मुंबई ठाण्यासह उत्तर मध्य महाराष्ट्रावर ढगाळ वातावरण असल्यानं अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, बीडमध्येही आजच्या दिवसात पावसाची शक्यता आहे.